महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १८ ऑक्टोबर | मॉन्सून राज्यातून तडीपार झाला असला तरी काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. आज कोकणात सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा तर उर्वरित राज्यात उन्हाची झळ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात थोड्या अधिक प्रमाणावर ढगाळ हवामान, उन्हाची झळ आणि उकाडा अनुभवायला मिळत आहे. कमाल तापमानाचा पारा सातत्याने ३२ अंशांपार असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना उन्हाचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.५ अंश सेल्सिअस, सांताक्रूझ, जळगाव, रत्नागिरी, अमरावती येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
पावसाला पोषक हवामान झाल्याने शुक्रवारी सकाळपर्यंत कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, मुंबई शहर, नाशिक आणि बीड जिल्ह्यांत रिमझिम पावसाच्या सरी पडल्या. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे सर्वाधिक ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
आज कोकणासह घाटमाथ्यावर पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान, तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहून, राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.दरम्यान पुढील काही असचं वातावरण राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.