महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २२ ऑक्टोबर २०२५ | राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही — पण राजकीय पक्ष मात्र तयार आहेत!नगरपालिका निवडणुका आधी होतील, असा अंदाज बांधून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपसह महायुतीचे घटक पक्ष आणि विरोधक सर्वांनीच बैठका सुरू केल्या आहेत. वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना थेट आदेश — “नगरपालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरा!”
आयोगाकडून अजून अंतिम निर्णय झालेला नाही. नगरपालिका आधी की जिल्हा परिषद? — हा प्रश्न अजूनही खुलाच आहे.सूत्रांनुसार, आयोगाने यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून मते मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.अलीकडच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे ग्रामीण भागात मोठे नुकसान झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लगेच घेणे कठीण असल्याचे संकेत आहेत.म्हणूनच आयोगाने नगरपालिका निवडणुका आधी घेण्याचा पर्याय गृहीत धरला आहे.
पूर्वतयारीसाठी मतदार याद्या, आरक्षण निश्चिती, मतदान केंद्रांची आखणी — या सर्व प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.यावेळी आयोगाने नगरपालिका व जिल्हा परिषदांची तयारी एकत्रच करण्यावर भर दिला आहे.
❓ निकाल एकत्र की वेगळे?
जर नगरपालिका निवडणुका आधी झाल्या, तर निकाल लगेच लावायचे का नंतर एकत्रित जाहीर करायचे — हा नवा पेच निर्माण झाला आहे.लवकर निकाल लावल्यास त्याचा परिणाम पुढील निवडणुकांवर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
🗓️ नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घोषणा शक्य
सूत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि शेवटी जानेवारी अखेरीस महापालिका निवडणुका घेण्यात येतील.
राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून २० दिवस लागणार आहेत. त्यामुळे आचारसंहितेचा फटका बसू नये म्हणून महायुतीसाठी नगरपालिका निवडणुका आधी घेणे राजकीय दृष्ट्या अधिक सोयीचे ठरेल, असे स्पष्ट संकेत आहेत.