हिवाळी अधिवेशनात चर्चा तापणार, पण नागपूरचं तापमान गोठणार!

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ७ डिसेंबर २०२५ | राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ८ डिसेंबरपासून सुरुवात होत असताना नागपूरचं राजकीय पारडं तापेल, पण हवामान मात्र कडक थंडीत गोठेल, अशी स्थिती दिसत आहे. जमीन घोटाळा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नाशिक कुंभमेळ्यातील वृक्षतोड आणि महिला अत्याचारातील वाढ—या सर्वच विषयांवर सत्ताधारी- विरोधकांत जोरदार खडाजंगी ओसंडेल. पण या सर्व गदारोळात आमदार–मंत्र्यांना सर्वात आधी जाणवणार ते नागपूरच्या थंडीचं झोंबणारं अस्तित्व.

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट स्थिरावली असून नागपुरात पारा तब्बल ८.६ अंशांपर्यंत घसरला आहे. १०–१२ अंशांच्या सातत्यपूर्ण तापमानानंतर पुढील आठवड्यात अजून २ अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागपुरात ‘उबदार चर्चेसाठी’ येणाऱ्यांना प्रत्यक्षात ‘हिल स्टेशनचा अनुभव’ मिळणार हे मात्र शाश्वत मानायला हरकत नाही.

उपराजधानी नागपूर हे फक्त संत्री, सावजी किंवा वाघांच्या चर्चेसाठी प्रसिद्ध नाही; तर ते महाराष्ट्राचे खरे ‘विंटर कॅपिटल’ आहे. डिसेंबर महिन्यात राज्य सरकार संपूर्ण तळ ठोकत असते—ही परंपरा १९६० पासून आजवर अबाधित सुरू आहे. थंडीच्या पदरात गुडूप होणाऱ्या नागपूरच्या या हवामानात राजकारणाची धामधूमही तितक्याच जोरात उकळत राहते.

हिवाळी अधिवेशन म्हणजे नागपूरकरांसाठी अभिमानाचा सोहळा आणि नेतेमंडळींसाठी वैदर्भीय पाहुणचाराचा ‘अनुभवसंपन्न’ आठवणींचा मौसम. थंडीच्या पांघरुणाखाली चालणाऱ्या या सत्रात विधानसभेची उष्णता वेगळीच असेल, पण नेता-मंत्र्यांना मात्र एक सल्ला—विचार मांडताना तापून जा, पण थंडीपासून सावध रहा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *