Pune to Nagpur :पुणे–नागपूर अवघ्या ५ तासांत; गडकरींच्या घोषणेने ‘दहा तासांचा कंटाळा’ इतिहासजमा

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १५ डिसेंबर २०२५ | पुण्याहून नागपूरला जाणं म्हणजे आजवर वेळेची, संयमाची आणि कधी कधी पाठीच्या कण्याचीही परीक्षा होती. ७०० किलोमीटरचा प्रवास, दहा ते बारा तासांचा त्रास आणि शेवटी “पोचलो रे बाबा” असा सुटकेचा निःश्वास! पण आता या सगळ्यावर नितीन गडकरींनी फुलस्टॉप टाकला आहे. पुणे ते नागपूर हा प्रवास अवघ्या पाच तासांत होईल, असा ठाम दावा त्यांनी केला आहे. ऐकताना हे स्वप्न वाटेल, पण महामार्गांच्या जाळ्यातून हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा गडकरींचा निर्धार दिसतो. ‘रस्ते म्हणजे केवळ डांबरी पट्टे नव्हेत, तर विकासाची धावपट्टी आहे,’ हे त्यांनी पुन्हा एकदा ठासून सांगितले आहे.

या संपूर्ण योजनेचा कणा म्हणजे पुणे–छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वे. हा एक्सप्रेस वे थेट मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे पुणे ते संभाजीनगर प्रवास फक्त दोन तासांत पूर्ण होईल आणि पुढे नागपूर गाठायला आणखी तीन तास पुरेसे ठरतील. म्हणजे आजचा दहा-बारा तासांचा प्रवास उद्या पाच-सहा तासांत! १६,३१८ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारल्या जाणाऱ्या या महामार्गात पुणे–अहिल्यानगर–संभाजीनगर हा पहिला टप्पा असून, उड्डाणपूल, दुरुस्ती आणि आधुनिक सुविधांवर भर दिला जाणार आहे. शिक्रापूरहून बीडमार्गे जाणारा पर्यायी रस्ताही तयार होणार असल्याने मराठवाड्याचा पुण्याशी थेट संपर्क अधिक सुलभ होणार आहे.

गडकरींच्या या घोषणेत केवळ पुणे–नागपूरच नाही, तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचं भविष्य दडलं आहे. तळेगाव–चाकण–शिक्रापूर चारस्तरीय एलिव्हेटेड प्रकल्प, हडपसर–यवत एलिव्हेटेड रोड, नाशिक फाटा–खेड महामार्ग असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प रांगेत उभे आहेत. सुमारे ५० हजार कोटींची कामे एकट्या पुणे जिल्ह्यासाठी मंजूर झाली आहेत. उद्योग, वाहतूक, रोजगार आणि वेळेची बचत—या चौघांचा संगम म्हणजे हे महामार्ग. थोडक्यात काय तर, आता पुणे–नागपूर प्रवासात “कधी पोहोचतो?” हा प्रश्न मागे पडेल आणि “इतक्या लवकर कसं?” हा प्रश्न पुढे येईल—, हा रस्ता नाही; ही महाराष्ट्राची धावती महत्त्वाकांक्षा आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *