भारतात दर शुक्रवारी संध्याकाळी ७ ते ८ वाजता सर्वाधिक UPI व्यवहार; ‘या’ कारणामुळे होते पैशांची उधळण

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १६ डिसेंबर २०२५ | डिजिटल व्यवहारांच्या युगात भारतीय तरुणांची खर्च करण्याची पद्धत झपाट्याने बदलत असल्याचे चित्र समोर आले आहे. ‘सुपर मनी’ या यूपीआय अ‍ॅपने गेल्या वर्षभरातील लाखो व्यवहारांचा अभ्यास करून तयार केलेल्या अहवालातून महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. विशेष म्हणजे, देशभरात दर आठवड्याला शुक्रवारी संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत सर्वाधिक यूपीआय व्यवहार होतात, असे या अहवालात स्पष्ट झाले आहे.

या अहवालानुसार, सुपर मनीच्या सुमारे ७२ टक्के युजर्सचे वय ३० वर्षांखालील आहे. त्यामुळे मेट्रो शहरांपासून ते लहान शहरांपर्यंत तरुणांच्या आर्थिक सवयींचे अचूक प्रतिबिंब या अभ्यासातून मिळते. डिजिटल पेमेंट ही आता गरज न राहता सवय बनली आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे, ७४ टक्के तरुण दरमहा ५० पेक्षा अधिक डिजिटल व्यवहार करतात, तर यापैकी मोठा वर्ग दरमहा २०० हून अधिक यूपीआय व्यवहार करत असल्याचे दिसून आले आहे.

खाद्यपदार्थ खरेदी, कॅब बुकिंग, मित्रांमध्ये बिल वाटून घेणे अशा दैनंदिन गोष्टींसाठी क्यूआर कोड स्कॅन करणे तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. यामुळेच यूपीआय व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते. अहवालातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सुमारे ७६ टक्के यूपीआय व्यवहार हे २०० रुपयांपेक्षा कमी रकमेचे आहेत. म्हणजेच, किरकोळ खरेदी, चहा-नाश्ता, किराणा आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंवर डिजिटल पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

दिवसभरातील व्यवहारांचा विचार केला असता, मध्यरात्री ते पहाटे ६ वाजेपर्यंत खाद्यपदार्थांच्या ऑर्डरमध्ये वाढ झाल्याचे दिसते. उशिरापर्यंत जागण्याची सवय आणि ऑनलाइन फूड डिलिव्हरी यामुळे हा कल वाढत आहे. सकाळी ६ ते ११ या वेळेत किराणा आणि सुपरमार्केटमधील खरेदीसाठी सर्वाधिक यूपीआय व्यवहार होतात.

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत व्यवहारांची संख्या सर्वोच्च पातळीवर पोहोचते. आठवडाभराच्या कामानंतर सुट्टीचा मूड, बाहेर जेवण, मित्रमैत्रिणींमध्ये फिरणे, मनोरंजन आणि छोट्या आनंदांसाठी होणारी खर्चवाढ यामागील मुख्य कारण असल्याचे सुपर मनीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. डिजिटल पेमेंटमुळे खर्च करणे अधिक सोपे झाले असून, त्यामुळे तरुणांची आर्थिक जीवनशैली पूर्णपणे बदलत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *