![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ४ फेब्रुवारी २०२६ | कधी काळी मुंबई म्हणजे अरुंद रस्ते, गर्दीचा श्वास आणि “लवकर निघालो तरी उशीरच” ही खात्री. पण आता तीच मुंबई आरशात पाहून स्वतःलाच ओळखू शकत नाही, इतकी बदललीय! जिथं कधीकाळी समुद्राच्या लाटा होत्या, तिथं आज डांबरी रेषा धावतायत. कोस्टल रोडनं शहराच्या प्रवासात वेग टाकला आणि आता त्यालाच थेट आकाशाची जोडणी देण्याचा घाट घातलाय. रस्ता, पूल, सागरी सेतू यानंतर आता हेलिपॅड— म्हणजे “जमिनीवर ट्रॅफिक, आकाशात झेप” असा मल्टीमोडल चमत्कार! मुंबईनं ठरवलंय— फक्त धावायचंच नाही, तर उडायचंही!
मरिन ड्राइव्हपासून वांद्र्यापर्यंत कोस्टल रोडनं अंतर कमी केलं, चिडचिड कमी केली आणि वेग वाढवला. पण मुंबई इथंच थांबते का? नाहीच! आता याच कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारण्याचा मेगाप्लान समोर आलाय. निविदा प्रक्रियेला मोठ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून, रेमंइस आणि जिंदाल यांच्यात चुरस रंगली आहे. हेलिपॅडची उभारणी, संचालन, देखभाल— सगळं कंत्राटदाराकडे. म्हणजे रस्ता फक्त गाड्यांसाठी नाही, तर हेलिकॉप्टरसाठीही! नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत झपाट्यानं पोहोचायचं स्वप्न आधीच होतं, आता ते स्वप्न थेट आकाशमार्गे पूर्ण होणार, असं चित्र दिसतंय. मुंबईचा प्रवास आता “डावीकडे समुद्र, वरती आकाश” असा थ्री-डी होतोय.
या सगळ्यात सर्वसामान्य मुंबईकराला काय मिळणार, हा प्रश्न साहजिक आहे. उत्तर सोपंय— दिलासा! शहरात मोठी रुग्णालयं आहेत, एअर अॅम्ब्युलन्सची गरज वारंवार भासते. आजवर विमानतळावर उतरा, मग रुग्णवाहिकेतून रुग्णालयात— वेळ जातो, धडधड वाढते. दक्षिण मुंबईत हेलिपॅड झालं, तर थेट उपचारांच्या दारात उतरण्याची सोय होईल. म्हणजे हा प्रकल्प केवळ ‘शो ऑफ’ नाही, तर ‘सेव्ह ऑफ लाईफ’ही! त्यामुळे कोस्टल रोड आता फक्त रस्ता राहणार नाही, तर मुंबईच्या भविष्यातील उड्डाणपुल ठरेल. प्रश्न इतकाच— हे स्वप्न प्रत्यक्षात कधी उतरतं? पण एक नक्की… मुंबईनं पुन्हा एकदा सांगितलंय, “माझं आकाशही माझंच आहे!”
