![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ मार्च २०२६ ।। अनेक वर्षे प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणाऱ्या Mumbai–Goa Highwayला अखेर गती मिळणार असल्याचे संकेत विधान परिषदेत मिळाले. भाजपचे आमदार Niranjan Davkhare यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत प्रलंबित कामांचा जाब विचारला. चर्चेत सहभागी होताना गटनेते Pravin Darekar यांनी, “समृद्धी झाला; पण मुंबई–गोवा महामार्गावरून जाताना आजही प्रचंड त्रास सहन करावा लागतो,” अशी स्पष्ट टीका केली. रखडलेली कामे, कंत्राटदारांचा विलंब आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या गांधारपाले लेणी परिसरात पायाभूत सुविधांची गरज याकडेही त्यांनी लक्ष वेधले. इतर सदस्यांनीही उपप्रश्न विचारत कामे पूर्ण होण्याची ठोस वेळ मागितली.
यावर उत्तर देताना मंत्री Shivendraraje Bhosale यांनी सविस्तर माहिती दिली. माणगाव व इंदापूर बाह्य वळण मार्गासह तीन रेल्वे उड्डाणपूल आणि दोन मोठ्या पुलांची कामे सुरू असून जुलै २०२५ मध्ये त्यांना प्रारंभ करण्यात आला आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला बदलून नवी एजन्सी नेमण्यात आली असून माणगाव–इंदापूर बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर माणगावातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा दावा सरकारने केला. चिपळूण येथील पुलाचे मुख्य काम पूर्णत्वास आले असून मे २०२६ पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे लक्ष्य आहे.
संगमेश्वर येथील हातखंबा उड्डाणपुलाचे काम एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. येत्या गणेशोत्सवात होणारी नेहमीची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी माणगाव–महाड मार्गावरील ताम्हिणी घाटाचा बाह्य वळण मार्ग पावसाळ्यापूर्वी, म्हणजे मे महिन्यात पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जुलै २०२७ पर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघातांनी बदनाम झालेला हा महामार्ग आता खऱ्या अर्थाने धावू लागेल का, याकडे कोकणवासीयांसह लाखो प्रवाशांचे लक्ष लागले आहे. शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार कामे पूर्ण झाली, तर मुंबई–गोवा प्रवास खऱ्या अर्थाने सुसह्य होण्याची आशा निर्माण झाली आहे.
