![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ मार्च २०२६ ।। देशाच्या विकासाचा नकाशा काढताना रस्ते, रेल्वे आणि बंदरं यांची चर्चा नेहमी होते; पण आता आकाशमार्गही त्या नकाशात ठळकपणे दिसू लागला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ ने ‘उडान’ योजनेच्या नव्या आवृत्तीला दिलेली मंजुरी ही केवळ एक सरकारी घोषणा नाही, तर ती भारताच्या ‘हवाई क्रांती’ची सुरुवात आहे. १०० नवीन विमानतळ आणि २०० हेलिपॅड उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला गेला आहे. एकेकाळी ‘विमान प्रवास’ हा केवळ श्रीमंतांचा विशेषाधिकार मानला जात होता; पण आता तो सामान्यांच्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. २८,८४० कोटी रुपयांचा प्रचंड निधी आणि पुढील १० वर्षांची योजना पाहता, हा केवळ प्रकल्प नाही तर देशाच्या कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय आहे.
या योजनेची खरी ताकद आहे ती ‘दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्याची’ क्षमता. जिथे आजपर्यंत रेल्वेचा आवाजही पोहोचला नाही, तिथे आता हेलिकॉप्टरची पंखं फडफडतील. राज्य सरकारांच्या मदतीने वापरात नसलेल्या धावपट्ट्यांना पुन्हा जीव मिळणार आहे. अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्याप्रमाणे, प्रत्येक विमानतळाला आणि हेलिपॅडला आर्थिक मदत दिली जाणार आहे, जेणेकरून केवळ उभारणीच नाही तर देखभालही व्यवस्थित होईल. ‘पवनहंस’साठी हेलिकॉप्टर आणि ‘अलायन्स एअर’साठी नवीन विमाने घेण्याचा प्रस्ताव म्हणजे या योजनेचा विस्तार केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरण्याची खात्री आहे.
मात्र, या स्वप्नवत योजनेच्या पंखांना वास्तवाचा वारा किती साथ देईल, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. भूतकाळात अनेक प्रकल्पांची घोषणाच राहिली, प्रत्यक्षात काहीच घडलं नाही, ही वस्तुस्थितीही नाकारता येत नाही. विमानतळ उभारणे सोपं; पण त्यांना प्रवासी, सेवा आणि सातत्य देणं हेच खरं आव्हान असणार आहे. तरीही, जर ही योजना खऱ्या अर्थाने राबवली गेली, तर भारताच्या गावागावांमध्ये ‘आकाशाशी जोडलेली स्वप्नं’ प्रत्यक्षात उतरतील, यात शंका नाही.
