नियम मोडून लोकलप्रवास केल्याने मनसे नेते संदीप देशपांडेंसह चार जणांना अटक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २२ सप्टेंबर -कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बंद करण्यात आलेली लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी करत मनसेने काल सविनय कायदेभंग आंदोलन करत लोकल प्रवास केला होता. या आंदोलन प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चार जणांविरुद्ध कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त टीव्ही नाईन मराठीने दिले आहे. मनसेच्या या नेत्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असून, सकाळी ११ वाजता त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

मुंबई आणि उपनगरामधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र इतर प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची परवानगी सरकारकडून अद्याप देण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार मनसे नेते संदीप देशपांडे आणि अन्य नेत्यांनी काल लोकल प्रवास केला होता. दरम्यान, आज सकाळी त्यांना अटक करण्यात आली. संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, गजानन काळे आणि अतुल भगत यांनाही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, मला अजून अटक करण्यात आलेली नाही. आम्ही स्वतः पोलिसांकडे जात आहोत. प्रवास केला म्हणून अटक झाल्याची कदाचित ही देशातील पहिलीच घटना असेल. या कारवाईमधून सरकारचा आकस दिसून येतो आहे. आम्ही केलेले आंदोलन प्रतिकात्मक आहे. प्रवाशांच्या समस्यांबाबत सरकारने आमच्याशी बोलावे, किमान प्रवासी संघटनांशी बोलावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

विषाणूच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर बंद करण्यात आलेली मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकलेली नाही. लोकलसेवा बंद असल्याने कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. यानंतर सोमवारी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलने प्रवास करून आंदोलन केले. यावेळी संदीप देशपांडे म्हणाले की, आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी लोकल सुरु करा. बसमध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे, अशी अनेकवेळा राज्य सरकारकडे मागणी केली होती. बसमधून प्रवास केल्यास कोरोना पसरत नाही. मात्र रेल्वेने प्रवास केल्यास कोरोना पसरतो असा सरकारचा समज आहे. त्यामुळे आज आम्ही सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. त्याप्रमाणे आम्ही नाकावर टिच्चून हा रेल्वे प्रवास करत आहोत, असं संदीप देशपांडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *