![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ मे २०२६ ।। भारतीय रुपयाने अखेर असा टप्पा गाठला की, अर्थतज्ज्ञांच्या कपाळावर आठ्या आणि सामान्यांच्या मनात धडकी भरली. डॉलरसमोर रुपया पहिल्यांदाच ९६ च्या पुढे घसरला आणि अर्थव्यवस्थेच्या पाया खालील जमीनच हादरल्याचे चित्र निर्माण झाले. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर भडकले, जागतिक बाजारात अस्थिरता वाढली आणि त्याचा थेट फटका भारतीय चलनाला बसला. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ९६.१४ पर्यंत घसरला, तर दिवसअखेरीस तो ९५.८६ वर बंद झाला. “रुपया घसरतोय” ही बातमी अनेकदा लोक सहज ऐकून पुढे जातात; पण प्रत्यक्षात याचा अर्थ असा असतो की, उद्याचा पेट्रोल पंप, किराणा दुकान आणि मोबाईल शोरूम सर्वसामान्यांच्या खिशाला अधिक जड जाणार आहे. देशाच्या अर्थकारणातील ही केवळ आकड्यांची घसरण नाही, तर महागाईच्या नव्या वादळाची चाहूल मानली जात आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतींनी प्रति बॅरल १०९ डॉलरचा टप्पा ओलांडल्याने सरकारची चिंता अधिकच वाढली आहे. कारण भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो आणि रुपया कमकुवत झाला की आयातीचा खर्च आणखी वाढतो. त्याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स, सोने, परदेशी शिक्षण, विमानप्रवास आणि आयातीत औषधांवर होतो. म्हणजे डॉलरचा दर वाढला की, भारतीयांच्या रोजच्या आयुष्याचा खर्चही नकळत वाढू लागतो. गेल्या सहा व्यवहार सत्रांत रुपया जवळपास दोन टक्क्यांनी कोसळला असून, वर्षभरात सहा टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. त्यामुळे अर्थ मंत्रालयातील ‘नॉर्थ ब्लॉक’मध्ये तातडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. परकीय गुंतवणूकदारांचा ढासळलेला विश्वास परत मिळवण्यासाठी सरकार आता करसवलती आणि नियम सुलभ करण्याच्या तयारीत आहे. “विदेशी पैसा आणा आणि अर्थव्यवस्था वाचवा,” अशी वेळ आता सरकारवर आल्याचे चित्र दिसू लागले आहे.
दरम्यान, शेअर बाजारालाही या घडामोडींचा फटका बसला. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले असून गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. गेल्या काही महिन्यांत परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल दोन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. एआय क्षेत्रातील अपेक्षित गुंतवणूक न मिळाल्याने भांडवली प्रवाह कमी झाल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे सरकार आता ‘विथहोल्डिंग टॅक्स’ कमी करण्यासह मोठ्या उद्योगांना तातडीने मंजुरी देण्याच्या तयारीत आहे. पण सामान्य नागरिकांसाठी प्रश्न एकच आहे — रुपया घसरत असताना त्यांच्या घरखर्चाचा गाडा कसा ओढायचा? महागाईचा डबलबार आता फक्त अर्थतज्ज्ञांच्या भाषणात राहिलेला नाही; तो घराघरातील बजेटचा शत्रू बनून उभा ठाकला आहे.
