![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मे २०२६ ।। सोन्याच्या चमकदार दुनियेनंतर आता सरकारची नजर थेट चांदीवर गेली आहे. केंद्र सरकारने चांदीच्या आयातीवर अचानक निर्बंध लादत व्यापारी आणि गुंतवणूकदारांना मोठाच धक्का दिला आहे. चांदीचे अनेक प्रकार मुक्त आयात यादीतून काढून प्रतिबंधित श्रेणीत टाकण्यात आले आहेत. म्हणजे आता पूर्वीसारखी सहज आयात होणार नाही; त्यासाठी परवानग्या, मंजुरी आणि सरकारी कागदोपत्री फेऱ्या वाढणार आहेत. सरकारचा हा निर्णय जाहीर होताच बाजारात चर्चांना उधाण आले. “सोन्याला आवर घातला, तर लोक चांदीकडे धावतील,” हा अंदाज बांधून सरकारने आधीच दारावर कुलूप ठोकल्याची भावना व्यापारी वर्तुळात व्यक्त होत आहे. महागाई, डॉलरचा वाढता दबाव आणि परकीय चलन साठ्याची चिंता यामुळे सरकार आता मौल्यवान धातूंवर अधिक कठोर भूमिका घेताना दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांत सोने आणि चांदीच्या आयातीत झालेली वाढ सरकारसाठी डोकेदुखी ठरली होती. आधीच सोन्या-चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. पण सोन्याच्या तुलनेत चांदी स्वस्त असल्याने गुंतवणूकदार आणि दागिने उद्योगातील लोक मोठ्या प्रमाणावर चांदीकडे वळू लागले. सरकारला हीच बाब धोक्याची घंटा वाटू लागली. कारण भारतात मौल्यवान धातूंची आयात वाढली की, थेट परकीय चलन साठ्यावर ताण येतो आणि व्यापार तूट वाढते. एका बाजूला रुपयावर दबाव वाढत असताना दुसऱ्या बाजूला आयातीचा खर्च फुगत चालल्याने सरकारने आता “सावध पवित्रा” घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, जर ही आयात नियंत्रणाबाहेर गेली तर चालू खात्यातील तूट वाढून अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, सरकारी आकडेवारीनेही परिस्थितीचे गांभीर्य दाखवून दिले आहे. एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीची आयात तब्बल ३० वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. वाढलेले आयात शुल्क, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढे दर आणि आता नव्या निर्बंधांमुळे पुढील काही महिन्यांत चांदीची आयात आणखी घटण्याची शक्यता आहे. मात्र याचा परिणाम दागिने उद्योग, छोटे व्यापारी आणि गुंतवणूकदारांवर होणार हेही तितकेच खरे आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताची सोन्याची आयात विक्रमी ७१.९८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली, तर निर्यात मात्र घसरली. त्यामुळे सरकारने आता “चमकणाऱ्या धातूंवर नियंत्रण” ठेवण्याचा निर्धार केल्याचे चित्र दिसत आहे. बाजारात मात्र एकच चर्चा रंगली आहे — “आता चांदीही सरकारच्या रडारवर आली!”
