![]()
युद्धाच्या ज्वाळांनी अर्थव्यवस्था तापली; RBI चा गंभीर इशारा
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ मे २०२६ ।। RBI Warning of Inflation: मध्य-पूर्वेतील युद्धाच्या धुराने आता थेट सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरात प्रवेश केला आहे. इस्त्रायल-इराण आणि त्यानंतर अमेरिका-इराण संघर्षामुळे जगभर ऊर्जा संकटाची भीषण चाहूल लागली असून भारतालाही त्याची मोठी झळ बसू लागली आहे. गेल्या दहा दिवसांत इंधन दरवाढीचे तीन फटके बसल्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेला इशारा सामान्य नागरिकांच्या खिशाला अक्षरशः हादरवणारा ठरत आहे. “ही तर केवळ सुरूवात आहे,” असा संकेत देत RBI ने देशात महागाईच्या दुसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला आहे. युद्धाची धग अशीच कायम राहिली तर पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजीसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकतील, असा गंभीर अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जगण्याचा हिशेब पुन्हा एकदा कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती दिवसागणिक वाढत आहेत. समुद्रमार्गावरील तणाव, तेलवाहू जहाजांवरील संकट आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे इंधन दरवाढ अटळ मानली जात आहे. RBI ने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, युद्ध आणखी चिघळले तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होईल. रुपयावर दबाव वाढेल, आयात महागेल आणि व्यापार तुटीचे संकट गडद होईल. आधीच घरखर्च, वीजबिल, शिक्षण आणि औषधांच्या वाढत्या खर्चाने नागरिक हैराण झाले असताना आता इंधन दरवाढीने त्यात आणखी भर पडणार आहे. “पेट्रोल वाढलं की सगळंच वाढतं,” हे वाक्य पुन्हा एकदा वास्तव ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण इंधन महागले की वाहतूक महागते, वाहतूक महागली की बाजारातील प्रत्येक वस्तूचा भाव उसळतो.
RBI च्या या इशाऱ्यामुळे उद्योग, व्यापारी आणि शेअर बाजारातही चिंतेचे वातावरण पसरले आहे. महागाईचा स्फोट झाल्यास परदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसा काढून घेऊ शकतात, अशी भीती आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण आणि अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत वेगाने धावणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला या संकटामुळे मोठा ब्रेक लागू शकतो. RBI ने २०२६-२७ साठी आर्थिक वाढीचा अंदाज ६.९ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहू शकतो, असे संकेत दिले आहेत. सध्या महागाई नियंत्रणात असली तरी इंधन संकट वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. “युद्ध हजारो किलोमीटर दूर असलं तरी त्याची आग भारतीयांच्या खिशापर्यंत पोहोचते,” हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.
सामान्य नागरिकांसाठी येणारे दिवस आणखी कठीण ठरणार का, असा प्रश्न आता उभा राहू लागला आहे. आधीच बेरोजगारी, वाढते खर्च आणि आर्थिक अस्थिरता यामुळे मध्यमवर्ग त्रस्त झाला असताना आता महागाईच्या नव्या लाटेची चाहूल लागल्याने चिंता अधिक वाढली आहे. बाजारात दरवाढीची कुजबुज सुरू झाली असून व्यापाऱ्यांनीही वाहतूक खर्च वाढल्याची तक्रार मांडायला सुरुवात केली आहे. युद्ध, तेल आणि महागाई या त्रिकोणात सामान्य माणूस पुन्हा एकदा भरडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय संघर्षाचा हा आर्थिक भूकंप आता थेट भारतीयांच्या खिशावर कोसळणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
