![]()
गणेशोत्सवाच्या तोंडावर भाजीपाल्याचे दरही कडाडले; आवक घटल्याने गृहिणींचे बजेट कोलमडण्याची चिन्हे
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर २०२६ ।। श्रावण आला की ताटात मांसाहार कमी होतो आणि भाजीपाल्याची चांदी होते, हा बाजाराचा जुना हिशेब आहे. यंदाही त्याच हिशेबाने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसू लागला आहे. श्रावणातील उपवास, धार्मिक कार्यक्रम आणि बदललेली खाद्यपद्धती यामुळे भाजीपाल्यासह कांदा, लसूण आणि बटाट्याची मागणी वाढली आहे. त्यात गणेशोत्सव अगदी दारात येऊन उभा ठाकल्याने घरगुती खरेदीसोबतच गणेश मंडळांच्या कार्यक्रमांसाठीही भाजीपाल्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी बाजारात मागणी वाढली, पण त्याला पुरवठ्याची साथ मिळत नसल्याने दर वर सरकू लागले आहेत.
कांदा, लसूण आणि बटाटा हे स्वयंपाकघरातील तीन ‘अपरिहार्य’ खेळाडू. यापैकी एकाची किंमत वाढली तरी गृहिणीचे बजेट ढासळते; आणि तिन्हींचे भाव चढले की महिन्याच्या खर्चाचे गणितच उलटेपालटे होते. ग्रामीण तसेच शहरी बाजारपेठेत या तिन्ही वस्तूंच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यासोबत बटाटा, रताळे, काकडी, भोपळा, दुधी भोपळा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर यांनाही मागणी वाढली आहे. श्रावणातील उपवास आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे काही विशिष्ट भाज्यांची मागणी नेहमीपेक्षा अधिक राहते. त्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत असताना दरही त्यांच्या मागे धावताना दिसत आहेत.
ग्रामीण बाजारपेठेत स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या भाज्यांनाही दरवाढीची झळ बसली आहे. पालेभाज्यांपासून वांगी, भेंडी, गवार, दोडका, कारले, शेवगा आणि घेवडा अशा फळभाज्यांच्या किमती काही दिवसांपूर्वीच्या तुलनेत वाढल्या आहेत. पावसाळ्यात भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढते. शेतातून बाजारापर्यंत पोहोचेपर्यंत मालाचे नुकसान होते. त्यात वाहतूक खर्च वाढला आणि काही भागांत आवक घटली, तर बाजारभाव वाढण्याला निमित्तच मिळते. म्हणजे शेतकऱ्याला योग्य भाव मिळतोय का आणि ग्राहकाला महागाईचा फटका बसतोय का, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे बाजारपेठेच्या वेगवेगळ्या टोकांवर मिळतात.
गणेशोत्सवाच्या काळात बाजारात मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवस भाजीपाल्याचे दर सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. आधीच अन्नधान्य, गॅस आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या खर्चाने घरचे बजेट ताणलेले असताना आता स्वयंपाकघरातील कांदा-बटाटाही आपली ‘किंमत’ दाखवू लागला आहे. बाजारभावात वाढ झाली की तिचा थेट परिणाम ग्राहकाच्या ताटावर होतो; मात्र दर कमी झाले तर त्याचा फायदा तितक्याच वेगाने ग्राहकापर्यंत पोहोचतोच असे नाही, ही बाजाराची जुनी गंमत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवक वाढते का आणि दरांना काहीसा दिलासा मिळतो का, याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
