![]()
मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या ३५५ किमी प्रकल्पाचा खर्च ४८ टक्क्यांनी वाढून ₹१६,९०९ कोटी; आतापर्यंत ₹११,५७७ कोटी खर्चूनही अनेक भाग अपूर्ण
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० सप्टेंबर २०२६ ।। मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे कोकणवासीयांसाठी रस्ता कमी आणि संयमाची परीक्षा अधिक झाली आहे. चौपदरीकरणाचे स्वप्न दाखवून वर्षे उलटली; पण प्रवाशांच्या वाट्याला अजूनही खड्डे, अरुंद मार्ग, वाहतूक कोंडी आणि अपूर्ण कामेच आहेत. आता माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या आकड्यांनी या रखडलेल्या प्रकल्पाची दुसरी बाजू उघड केली आहे. महाराष्ट्रातील NH-66 च्या ३५५ किलोमीटरच्या दहा पॅकेजचा मंजूर खर्च ₹११,४०९.१४ कोटींवरून तब्बल ₹१६,९०९.२२ कोटी झाला आहे. म्हणजे जवळपास ₹५,५०० कोटींची आणि ४८ टक्क्यांची वाढ.
ही माहिती द यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या आरटीआयच्या उत्तरातून समोर आली. अधिक धक्कादायक बाब म्हणजे या दहा पॅकेजवर आतापर्यंत ₹११,५७७ कोटी खर्च झाल्याचे समोर आले आहे. म्हणजे मूळ मंजूर खर्चापेक्षाही अधिक रक्कम खर्च झाली, तरी रस्ता पूर्णत्वाला गेलेला नाही. सार्वजनिक पैशाचा हिशेब एवढा साधा असतो—काम पूर्ण, मग खर्च योग्य; पण इथे खर्च पुढे आणि काम मागे, अशी अवस्था दिसते.
सर्वाधिक खर्चवाढ परशुराम घाट–आरावली या ३४.४५ किलोमीटरच्या पॅकेजमध्ये झाली आहे. या कामाचा मूळ खर्च ₹९८३ कोटी होता; तो आता ₹२,२२६ कोटींवर पोहोचला आहे. म्हणजे तब्बल ₹१,२४३ कोटींची, अथवा १२६ टक्क्यांची वाढ. चिपळूण-रत्नागिरी आणि लांजा परिसरात अजूनही उड्डाणपूल, जोडरस्ते आणि अन्य कामे पूर्ण न झाल्याने वाहतुकीची कोंडी कायम असल्याचे वृत्त आहे.
प्रश्न केवळ खर्चाचा नाही, तर वेळ आणि जबाबदारीचा आहे. केंद्राच्या माहितीनुसार प्रकल्पाच्या विलंबामागे भूसंपादनातील अडथळे, मंजुरीतील विलंब आणि काही कंत्राटदारांची संथ प्रगती यांसारखी कारणे राहिली आहेत. मात्र कारणांची यादी वाढत गेली, तरी प्रवाशांचा त्रास कमी झालेला नाही.
समृद्धी महामार्गासारखा मोठा प्रकल्प तुलनेने कमी कालावधीत उभा राहतो आणि मुंबई-गोवा महामार्ग मात्र वर्षानुवर्षे रेंगाळतो, तेव्हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. ₹१६ हजार कोटींच्या पुढे गेलेल्या या रस्त्याला आता आणखी किती कोटी आणि किती वर्षे लागणार? याचे उत्तर कोकणवासीयांना हवे आहे.
