महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ४ ऑक्टोबर – नवीदिल्ली आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातही युवा खेळाडू त्यांची प्रतिभा दाखवताना दिसत आहेत, पण असेही काही खेळाडू आहेत, ज्यांची बॅट अजूनही शांत आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)च्या टीममधल्या दोन खेळाडूंची कामगिरी यंदा फारशी चांगली झालेली नाही. रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) आणि रियान पराग (Riyan Parag) यांच्या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) ने चिंता व्यक्त केली आहे. तसंच दोन्ही खेळाडू असेच अपयशी होत राहिले, तर त्यांना टीममधून बाहेर काढलं जाईल, असंही गंभीर म्हणाला आहे.
रॉबिन उथप्पाने यंदाच्या मोसमात निराशाजनक कामगिरी केली आहे. 4 मॅचमध्ये त्याला फक्त 33 रन करता आल्या आहेत. या 4 पैकी 3 इनिंगमध्ये उथप्पाला दोन आकडी रनही काढता आले नाहीत. शारजाह सारख्या बॅट्समनना फायदेशीर असणाऱ्या खेळपट्टीवरही उथप्पा 9 रन आणि 5 रन करुन आऊट झाला. यानंतर दुबईमध्ये कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये त्याला 2 रनच करता आले. बैंगलोरविरुद्ध उथप्पा 17 रन करुन आऊट झाला. उथप्पाला राजस्थानने लिलावात 3 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं.
‘रॉबिन उथप्पा आणि रियान परागसाठी वेळ संपत चालली आहे. उथप्पाला खूप अपेक्षा ठेवून विकत घेतलं पण त्याला स्वत:ला सिद्ध करता आलं नाही. उथप्पाला मॅच संपवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मधल्या ओव्हरमध्ये त्याने चांगली बॅटिंग करावी, अशी राजस्थानची अपेक्षा आहे, पण यामध्ये उथप्पा अपयशी ठरला,’ असं गंभीर म्हणाला.
रियान परागही फ्लॉप
राजस्थानचा ऑलराऊंडर रियान परागही आयपीएलमध्ये फ्लॉप ठरला आहे. परागने 4 मॅचमध्ये 23 रन केले आहेत. तर त्याला एक विकेटही घेता आलेली नाही. त्यामुळे पराग आणि उथप्पा यांच्यावर टीममधून बाहेर काढण्याची टांगती तलवार आहे.