महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – सोलापूर – दि. २१ ऑक्टो – : राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा आदेश नुकतेच दिले आहेत, याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. जलयुक्त शिवारप्रकरणी 700 तक्रारी प्राप्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, सहा लाख कामांमध्ये 700 तक्रारी अर्धा टक्कादेखील नाहीत, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
जलयुक्त शिवार ही योजना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मागच्या सरकारकडून सुरू करण्यात आली होती. ही त्यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. पण या योजनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने नुकतेच दिले.
सध्या देवेंद्र फडणवीस राज्यातली पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोना संकट संपल्यानंतर जलयुक्त शिवारमुळे किती फायदा झाला, याचं प्रदर्शनच भरवणार असल्याचं फडणवीस म्हणाले.
“तसंच, जलयुक्त शिवार योजनेत 700 तक्रारी प्राप्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, सहा लाख कामांमध्ये 700 तक्रारी हे प्रमाण अर्धा टक्केही नाही. सरकारी कामात एक टक्क्काही तक्रार येऊ नये, अशी माझी भूमिका आहे. पण त्यातही पाच ते सात टक्के ही किमान मर्यादा आहे. असं असूनही योजनेची जाणीवपूर्वक चौकशी लावण्यात आली. ही चौकशी लावून विरोधी पक्षनेत्याचं तोंड बंद करता येईल, असं वाटत असल्यास तसं काही होणार नाही. विरोधी पक्षनेता जनतेचा आहे, तो जनतेसाठीच काम करेल,” असं फडणवीस पुढे म्हणाले.