महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी -सिंधुदुर्ग – दि. २४ ऑक्टो – अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहे. प्राथमिक अहवालानुसार जिल्हय़ात 10 हजार 705 हेक्टर क्षेत्रावर भातपीक नुकसान झाले असून आतापर्यंत 14 हजार शेतकऱयांचे 6 हजार 501 हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. तीन प्रकारात पंचनामे करण्यात येत आहेत. पुढील चार-पाच दिवसांत सर्व पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
प्राथमिक अहवालानुसार जिल्हय़ात 10 हजार 705 हेक्टर क्षेत्रावरील भातशेती अतिवृष्टीत बाधित आहे. परंतु प्रत्यक्षात त्याहूनही अधिक नुकसान झाले आहे, हे आता पंचनामे करताना दिसून येत आहे. योग्य तऱहेने पंचनामे करण्याचे आदेश कृषी व महसूल यंत्रणेला देण्यात आले आहेत. तीन प्रकारात पंचनामे करण्यात येत असून उभी असलेली, आडवी झालेली भातशेती आणि जमीनदोस्त झालेली भातशेती या प्रमाणे पंचनामे करण्यात येत आहेत. तसेच बऱयाच ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने जनावरांसाठी गवतही मिळणार नाही, अशा भातपिकाचेही पंचनामे करण्यात येत आहेत. कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार 10 हजार 705 हेकटर क्षेत्र बाधित झाले आहे. आतापर्यंत 14 हजार शेतकऱयांचे 6 हजार 501 पंचनामे झाले झाले आहेत. दोन दिवस दुपारनंतर पाऊस कोसळल्याने पंचनामे करण्यात अडचणी आल्या. पाऊस बंद झाल्यास चार-पाच दिवसांत पंचनामे पूर्ण होतील. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक पंचनामे करीत असून या कामाला आता वेग आला आहे. सर्व प्रकारात नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले आहेत. नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनाम्यामधून सुटता नये, असेही आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.