महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – बुमला खिंड – दि. २६ ऑक्टो 1962च्या युद्धात चीनचा विजय झाला होता, पण आता परिस्थिती वेगळी आहे. चीनने अरुणाचलवर कितीही वेळा दावा केला तरी हिंदुस्थानी लष्कर व अरुणाचल प्रदेशची जनता तो कधीही मान्य करणार नाहीत. वेळ पडल्यास आम्ही हिंदुस्थानी सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढू, असे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी चीनला बजावले आहे. हिंदुस्थान-तिबेट सीमेवर बुमला खिंडीत आयोजित कार्यक्रमात त्यांनी हिंदुस्थान-चीन युद्धात 1962 मध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली.
त्या वेळी ते म्हणाले, ‘हे 1962 नाही, 2020 आहे. सगळय़ा गोष्टी आता बदलल्या आहेत. जम्मू-कश्मीरपासून अरुणाचलपर्यंत आम्ही सुसज्ज आहोत. जर वेळ पडली तर अरुणाचलचे लोक शस्त्र हाती घेऊन चीनविरुद्ध मैदानात उतरतील’. चीनने अजूनही अरुणाचल हा हिंदुस्थानचा प्रदेश असल्याचे मान्य केलेले नाही. तो दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे म्हटले आहे. तो दावा हिंदुस्थानने नेहमीच फेटाळला आहे.