महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ६ नोव्हेंबर – : पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. मागील दोन निवडणुकीत याठिकाणहून माजीमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे ही जागा राखणे भाजपच्यादृष्टीने प्रतिष्ठेचे झाले आहे. पण, त्या दोन निवडणुकांची व आताची स्थिती यामध्ये खूप फरक पडला आहे. राज्यातील सत्ता महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे काहीही झाले तरी ही जागा खेचून घेण्याच्या तयारीत महाविकासआघाडी आहे. भाजपकडून पाटील यांचा वारसदार म्हणून कोणाचे नाव निश्चित केले जाते याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
. निवडणूक जाहीर झाली असली तरी पक्षाचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही. गुरुवार (ता. 12) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपकडे अद्यापही एक आठवड्याची मुदत उमेदवार निश्चित करण्यासाठी आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील पदवीधर मतदार आपला प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठविणार आहेत. यापूर्वी दोनवेळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून विजय मिळविल्यामुळे त्यांचा वारसदार ठरविताना पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ज्या कोथरुडचे प्रतिनिधीत्व माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केले होते. त्यांनी आता पदवीधर मतदारसंघासाठी आपली दावेदारी पक्षाकडे मांडली आहे. त्यांना संधी द्यायची की त्यांची पुन्हा एकदा समजूत काढायची याचा विचार पक्षश्रेष्ठींमध्ये सुरु आहे.
सांगली भाजपचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे ते बंधू आहेत. त्यांचा सातारा जिल्ह्यात साखर कारखाना आहे. त्यामुळे पदवीधरची उमेदवारी आपल्यालाच मिळेल यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. पुणे भाजपचे शहर सरचिटणीस राजेश पांडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. संघ परिवारातील उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कुलकर्णी व पांडे हे दोन्ही इच्छुक पुण्यातील आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.