महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १३ नोव्हेंबर – :बिहार व अन्य राज्यांत भाजपाने चांगले यश मिळविले. त्यामुळे मोदी व भाजपा यांची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट होते. बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रभारी म्हणून काम पाहणारे देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत. ‘बिहारच्या जनतेने त्यांना विकास हवा असून जंगलराज नको आहे हे दाखवून दिल्याचे म्हटले आहे. बिहारच्या निवडणूक निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एड. प्रकाश आंबेडकर यांनी हा विजय आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलं आहे.
बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही, असे म्हणत ईव्हीएमच्या मुद्द्यावरुनही प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला काटावर बहुमत मिळाले आहे. 125 जागा जिंकत बिहारच्या मैदानात नितीश कुमार यांचा जेडीयू, भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीने बाजी मारली आहे, असे असले तरी आपण हा एनडीएचा विजय मानत नाही. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान फायदा करुन घेण्यासाठी भाजपचा बिहारमध्ये दंगली घडवण्याचा डाव होता. पण भाजपचा हा डाव आम्ही पूर्णत्वास जाऊ दिला नाही, असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला आहेत. तसेच, ईव्हीएम मशिनच्या मतदानावर लोकांचा विश्वास नाही. निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्यायला हव्यात, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.