महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १३ नोव्हेंबर – मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
यंदाची दिवाळी सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करुन साजरी करुया, आसपासच्या गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मदत करुन त्यांनाही दिवाळी आनंदात सहभागी करुन घेण्याची परंपरा यावर्षीही कायम राखूया, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
आपणा सर्वांना ‘दीपावली’ व आजच्या ‘धनत्रयोदशी’च्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा व्यक्त करतो. दिवाळी आनंदात, उत्साहात साजरी करीत असताना कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करूया.
उपमुख्यमंत्री अजित पवार दिवाळीच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं की, दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, प्रकाशाचा सण. दिवाळीनिमित्त घराघरात लागलेल्या दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-प्रथा-परंपरांचा अंधारही आपल्या जीवनातून दूर करण्याचा प्रयत्न करुया. आपलं राज्य सध्या कोरोना संकटाशी लढत आहे. ही लढाई लवकर जिंकायची असेल तर सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं पाहिजे. मास्क लावणं, गर्दी टाळणं, वारंवार हात धुत रहाणं, यासारखी दक्षता घेऊन प्रत्येकानं स्वत:ला, कुटुंबाला आणि समाजाला सुरक्षित ठेवण्यात योगदान द्यावं. दिवाळी सणाच्या काळात कोरोना आणि प्रदूषण वाढणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.