महाराष्ट्र 24 । अहमदनगर । विशेष प्रतिनिधी ।
‘विरोधी पक्षाने एखाद्या प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर त्या प्रश्नावर संवेदनशील होऊन राज्य सरकारने भूमिका घेतली पाहिजे होती. पण काँग्रेस व राष्ट्रवादीचं सोडा, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्चर्य वाटते की ते या दोन्ही पक्षांसोबत जाऊन कसे बिघडू शकतात? त्यांची संवेदनशीलता कशी इतकी शून्य होऊ शकते? असे प्रश्नच भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘एखादी व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर असल्यानंतर त्याने कर्तुत्व दाखवून राज्याचा गाडा सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाण्याची गरज असते. मात्र त्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे,’ असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
राज्य सरकारला वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने भाजपकडून राज्यात ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेण्यात येत आहे. आज नगरमध्येही फरांदे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. याप्रसंगी माजी मंत्री प्रा.राम शिंदे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गांधी, उपमहापौर मालन ढोणे, भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, सुनील रामदासी, सचिन पारखी आदी उपस्थित होते.
‘आम्हाला सरकार पाडण्याची अजिबात घाई झाली नाही. महाविकास आघाडी सरकार हे एकमेकांच्या अंतर्गत स्पर्धेमुळे व यांच्यातील विसंवादामुळे पडेल. आम्ही याची वाट बघत नाही,’ असे सांगत फरांदे पुढे म्हणाल्या, ‘राज्यात अतिशय सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करीत आहोत. मंदिर उघडावे, वीज बिल दरवाढ कमी व्हावी, याबाबतीत आम्ही आंदोलन केले. महिलांवर अन्याय अत्याचार झाले, त्यावर आंदोलन केले. दूध दरवाढीसाठी आंदोलन केले.