महाराष्ट्र 24 । पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी ।
आंदोलन कुठलेही-कोणाचेही असो शेतकऱ्यांचे असो की मराठा समाजाचे असो अथवा ओबीसींचे असो किंवा इतर कुणाचेही असो. जर आंदोलनाच्या विषयात काही तथ्य असेल तर त्यावर संबंधित जबाबदार सरकारने समझोता करून तडजोड काढण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. आंदोलन करणारे आंदोलन करत राहीले व कारभारी सरकार नुसतंच बघत राहिले तर यामध्ये देशाचेच नुकसान आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ कर सल्लागार पी. के. महाजन यांनी केले आहे. तसेच आंदोलक आणि सरकारच्या अनास्थेविषयी मार्मिक भाष्य केले आहे.
आंदोलनाचा विषय देशाच्या व देशातील जनतेच्यादृष्टीने हिताचा असेल तर आंदोलनाकडे दुर्लक्ष करून भागणार नाही हे जर माहीत असेल, तर त्यावर वेळेच भान ठेवून राजकारण व घमंडीपणा न करता देशाच्या भल्यासाठी दोघांनी समतोल मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काहीतरी मार्ग काढणारच असाल तर दोघांनीही आपली ताकद वाया न घालवता जनतेचे हीत बघीतले पाहिजे. आपण नक्की लोकशाही प्रधान देशात राहतो का असा प्रश्न पडायला लागला आहे. कारण आंदोलनाचे हत्यार दिवसेंदिवस बोथट होत चालले आहे.अगदी पार हाल अपेष्टा होवून जीव जाईपर्यंत आंदोलने करावी लागतात. तरीही निर्णय लवकर लागणार नसेल, तर भविष्यात लोकशाहीचा काहीच अर्थ राहणार नाही, असेही महाजन यांनी म्हटले आहे.