महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १६ डिसेंबर -भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला 17 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या टेस्ट मॅचआधी ऑस्ट्रेलियाचा मर्यादित ओव्हरचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) याने ऑस्ट्रेलियन टीमला सल्ला दिला आहे. विराट कोहली (Virat Kohli) चा सामना करताना योग्य संतूलन ठेवावं लागेल, तसंच त्याला उचकवणं उलटेल, अशी भीती एरॉन फिंच याने बोलून दाखवली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मैदानातले वाद, स्लेजिंग जगजाहीर आहेत.
मागच्यावेळी 2018-19 साली झालेल्या सीरिजमध्ये विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) यांच्यात बाचाबाची झाली होती. सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना एरॉन फिंच म्हणाला, ‘अनेकवेळा तणाव निर्माण होतील, पण यामध्ये संतुलन ठेवणं गरजेचं आहे. कोहलीला उचकावण्याची गरज नाही, असं केलं तर तो विरोधी टीमसाठी निर्दयी ठरतो.’
‘आता विराट खूप बदलला आहे. मैदानात तो खूप शांत असतो आणि खेळाचा प्रवाह समजतो. तो किती तयारी करतो, हे पाहून मीही हैराण झालो. विराट स्वत:ऐवजी विरोधी टीमवर कधीच लक्ष केंद्रीत करत नाही. आयपीएलमध्येही तो त्याच्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास ठेवतो,’ असं फिंच म्हणाला.
‘आम्ही खूप चांगल्या सीरिज खेळल्या, ज्यामध्ये तो खेळाडू म्हणून वेगळ्या स्तरावर होता आणि खूप आक्रमकही होता. आता त्याला शांत बघून चांगलं वाटलं,’ अशी प्रतिक्रिया फिंचने दिली आहे.