महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ डिसेंबर -ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी औरंगाबादेत शुक्रवारी माजी खासदार आणि ओबीसी नेते समीर भुजबळ यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. या दरम्यान समीर भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. आजचा मोर्चा शेवटचा असून यानंतरचे सर्व मोर्चे रद्द करण्यात आल्याचं समीर भुजबळ यांनी यावेळी जाहीर केलं आहे.
समीर भुजबळ यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं की, मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं आश्वासन महाविकास आघाडी सरकारनं दिलं आहे. त्यामुळे हा मोर्चा सरकारचं आभार मानणारा असून यानंतरचे सर्व मोर्चे रद्द करण्यात आले आहेत.
औरंगाबादेत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी समीर भुजबळांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी समीर भुजबळ यांनी सांगितलं की, अखिल भारतीय समता परिषद राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढत आहे. परंतु गेल्या आठवड्यात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन होतं. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला थोडाही धक्का लागणार नाही, असं आश्वासन दिलं आहे. त्याच बरोबर विरोधी पक्षानं देखील याबाबात सभागृहात बाजू मांडली. यासंदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही आम्ही भेट घेतली. त्यांनी देखील आम्हाला शब्द दिला आहे. त्यामुळे यापुढचे सर्व मोर्चे आम्ही रद्द करतो, अस समीर भुजबळ यांनी जाहीर केलं आहे.
या पुढे आम्ही अखिल भारतीय समता परिषदेचे ठिकठिकाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते संबंधित तहसिलदारांनी शांततेत निवेदन देतील. कुठेही गोंधळ होणार नाही. कोरोनाचा काळ आहे. आम्ही अहिंसेच्या मागार्नं आंदोलन करत आलो आहोत, असंही भुसबळ यांनी यावेळी सांगितलं.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं सरकारनं आश्वासन दिलं आहे. आमची मराठा आरक्षणाला विरोध नाही. पण ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकारनं याबाबत न्यायालयात आपली भक्कम बाजू मांडावी, ही आमची मागणी आहे. ती देखील सरकारनं मान्य केली आहे. त्यासाठी सरकार वकिलाचीही नियुक्ती करणार आहे.
