महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ डिसेंबर – देशात कोरोना महामारीचा धोका अद्याप टळलेला नसतानाही तामीळनाडू सरकारने बुधवारी जलिकट्टू म्हणजेच बैलांच्या आणि माणसांच्या झुंजीला परवानगी दिली. कोरोना प्रतिबंधांच्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे. सुमारे 2 हजार वर्षांहून अधिक जुना इतिहास असलेला हा खेळ पोंगल सणाच्या निमित्ताने खेळला जातो.
एका सरकारी पत्रकानुसार यंदा जलिकट्टूमध्ये केवळ 300 लोकांना भाग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामान्यपणे या खेळामध्ये दरवर्षी हजारो तरुण सहभागी होतात. जलिकट्टू आणि मंजुविरट्टू हे खेळ खुल्या मैदानात खेळवले जावेत असे निर्देशही सरकारी आदेशात देण्यात आले आहेत. तसेच हे खेळ पाहण्यासाठी दरवर्षी होणाऱया गर्दीइतकी गर्दी कार्यक्रम स्थळी चालणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले असून केवळ 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली आहे. खेळ पाहण्यासाठी येणाऱया सर्वांच्या शरीराचे तापमान तपासले जाईल. तसेच मास्क असणाऱयांना प्रवेश दिला जाईल आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागेल अशा अटी घालण्यात आल्या आहेत.