महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ११ जानेवारी – मकरसंक्रांतिनिमित्त राज्यभरात सर्वत्र पतंग उडवली जातात. त्या पार्श्वभूमीवर पतंग उडवा, पण वीजवाहिन्यांपासून दूर, असे आवाहन महावितरणने केले आहे. पतंगबाजीदरम्यान वीजवाहिन्यांवर मांजा अडकल्यास किंवा अनावधानाने पतंगबाज वीजवाहिन्यांच्या संपर्कात आल्यास जीवितहानीबरोबरच वित्तहानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे पतंग उडवताना सतर्क रहा असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.
राज्यात महापारेषणच्या उच्चदाब वीजवाहिन्यांचे जाळे जवळपास 48 हजार सर्किट किलोमीटरचे असून महावितरणच्या लघु व मध्यम वीजवाहिन्यांचे जाळे जवळपास पाच लाख किलोमीटरपेक्षा जास्त आहे.मोठी शहरे वगळता सर्वत्र खांबावरून वीजवाहिन्या टाकलेल्या आहेत. या वाहिन्यांमधून नेहमी वीजप्रवाह सुरू असतो. त्यामुळे वीज वाहिन्यांच्या परिसरात पतंग उडवताना अनेकदा मांजा, पतंग वीज वाहिन्यांना अडकण्याचे प्रकार घडतात. सदर पतंग काढण्यासाठी मुलांसह नागरिकांकडून लोखंडी रॉड, पाईप किंवा लांब तारेचा वापर केला जाते.
यावेळी वीजपुरवठा सुरू असेल तर विजेचा धक्का बसून जीवितहानी होते. तसेच वाहिन्यांबर अडकलेला मांजा खेचल्यास वीजवाहिन्या एकमेकांच्या संपर्कात येऊ, आग लागणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा घटना घडतात. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पतंग उडवताना विशेष काळजी घ्यावी, वीजवाहिन्यांवर अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
मोकळय़ा मैदानात पतंग उडवा
पतंग उडवण्यासाठी तरुणांनी वीजवाहिन्या किंवा गच्चीवरून पतंग उडवण्याऐवजी मोकळय़ा मैदानात पतंगबाजीचा आनंद लुटावा. आपण पतंगबाजीचा आनंद लुटत असताना इतरांची गैरसोय होऊ नये याचीही जाणीव ठेवावी असेही महावितरणने म्हटले आहे.