महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ जानेवारी – आजपासून(दि.15) देशात कोणत्याही लँडलाइन फोनवरुन मोबाईल नंबरवर फोन करण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल होत आहे. ‘ट्राय’च्या (Telecom Regulatory Authority of India – TRAI) आदेशानुसार लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी मोबाईल नंबरआधी शून्य (0) डायल करावा लागेल. ‘ट्राय’चा हा नवा आदेश आजपासून लागू होत आहे.
ट्रायने 29 मे 2020 रोजी याबाबत दूरसंचार विभागाला शिफारस केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी 20 नोव्हेंबर रोजी दूरसंचार विभागाने ट्रायची शिफारस स्वीकारताना टेलिकॉम कंपन्यांना आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले होते. दूरसंचार कंपन्यांना ही नवीन व्यवस्था स्वीकारण्याबाबतचं परिपत्रक विभागाकडून जारी करण्यात आलं होतं. या नवीन बदलामुळे दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांना नव्या फोन नंबरचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. डायल करण्याची पद्धत बदलल्यावर दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल सेवेसाठी 254.4 कोटी अतिरिक्त नंबर निर्माण करता येतील.
त्यामुळे आजपासून एखाद्या व्यक्तीने शून्य न लावता लँडलाइनवरुन मोबाईल नंबरवर फोन लावल्यास त्याला पहिले शून्य डायल करण्यास सांगितलं जाईल. दरम्यान, भविष्यात टेलिकॉम कंपन्या 11 अंकी मोबाइल नंबरही जारी करु शकतात. सध्या देशात मोबाईल ग्राहकांची संख्या वेगाने वाढतेय, त्यामुळे 10 अंकी मोबाईल नंबर कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.