महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २० जानेवारी – वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास आज दिले आहेत. ही थकबाकी लॉकडाऊन काळातील असून ताज्या आदेशाने ग्राहकांना मोठा झटका बसणार हे स्पष्टच दिसत आहे. डिसेंबर २०२० अखेर राज्यात एकूण ६३ हजार ७४० कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. डिसेंबर अखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे ४५ हजार ४९८ कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणिज्यिक, घरगुती व औदयोगिक ग्राहकांकडे ८४८५ कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे २४३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.
राज्यात मार्च २०२० मध्ये कोविड १९ मुळे लॉकडाऊन लावण्यात आला. लॉकडाऊन काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा निर्णय महावितरणने घेतला होता व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने आधीच दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णयही महावितरणने घेतला आहे. तसेच ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात खासगी वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची रितसर परवानगी घेऊन सप्टेंबर २०२० मध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबई व मुंबई उपनगरात चालू केली व थकबाकीपोटी अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला. मात्र उर्जामंत्री डॉ. राऊत यांनी डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे निर्देश महावितरणला दिले होते. परंतु, आता थकबाकीचा डोंगर वाढत चालल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला अशक्य होत चाललं आहे. बँकांची व इतर देणी तसेच कर्मचाऱ्यांचा पगार देणेही शक्य नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळेच टोकाचे पाऊल उचलले गेले आहे.
ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करावी लागते व त्यासाठी वीज पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. त्यामुळेच थकबाकी वसुली गरजेची झाली आहे. म्हणून थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना जानेवारीपासून मोहिमा राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले आहेत. थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले गेले आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा करून या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरणने केले आहे.