महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २५ जानेवारी – पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी घरे आहेत. पोलिस दलाची घरांची वाढती मागणी पाहता राज्य पोलिस दलासाठी एक लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात केली. नागपुरातील पोलिस महासंचालक कार्यालय आणि पाचपावली तसेच इंदोरा येथील पोलिस अंमलदारांच्या निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत होते. व्यासपीठावर पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह अपर पोलिस आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी, डॉ. दिलीप झळके, विनिता साहू, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांना मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगून राज्यात स्वातंत्र्यापूर्वी ४८ टक्के घरे होती. मात्र नंतरच्या काळात केवळ ४२ टक्के घरे बांधण्यात आली. घरांची ही कमतरता पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण संस्थेने तीन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केले आहेत, असे गृहमंत्री देशमुख म्हणाले.कोरोनामुळे राज्य शासनाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे पोलिस विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वरळी पोलिस सोसायटीच्या जागेत बांधण्यात येणार आहे. प्रकल्प बांधताना पूर्णत: बाहेरुन निधी उभारण्यात येणार असून कंत्राटदाराला ४ एफएसआय देण्यात येणार आहे.