महाराष्ट्र 24 । मुंबई । विशेष प्रतिनिधी – दि. २७ – प्रवाशांची वाढती संख्येमूळे लोकल प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन होत नाही, त्यामूळे पश्चिम रेल्वेने आपल्या सर्व लोकल फेर्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास रेल्वे बोर्डाने परवानगी दिली आहे. शुक्रवार २९ जानेवारी पासून पश्चिम रेल्वेवर दिवसभरात टाळेबंदीपुर्वीप्रमाणेच लोकलच्या १३६७ फेर्या धावणार आहेत.
कोरोनाच्या संक्रमणामूळे गेल्या २२ मार्चपासून लोकलची वाहतूक बंद करण्यात आली.त्यानंतर १५ जून पासून फक्त अत्यावश्यक सेवेकरीकरिता लोकलची मर्यादित वाहतूक सुरु करण्यात आली. त्यानंतर वकिल आणि महिलांना वेळेचे बंधन घालून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. सध्याच्या घडीला विविध २० घटकांना लोकल प्रवासाची मंजूरी आहे. महिलांना प्रवासाची मुभा मिळाल्याने लोकलच्या गर्दीत वाढ झाली आहे. त्यातच रेल्वे वाहतूकीच्या समस्येतून सुटण्यासाठी विदाउट तिकिट आणि बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवास करणार्याची संख्या देखील वाढू लागली आहे.त्यामूळे लोकलला पुर्वीप्रमाणेच गर्दी होउ लागली आहे.
कोरोनामूळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यासाठी एका लोकलमध्ये ७०० प्रवाशांना प्रवासाची परवानगी आहे. परंतु लोकलला होणार्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे तीनतेरा वाजत आहे. सध्याच्या घडीला पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसभरात १२०१ लोकल फेर्या चालविण्यात येत आहे. तर प्रवासी संख्या ११ लाख ५० हजारांच्या घरात पोहोचली आहे.परिणामी लोकलची संख्या वाढविण्यात येत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. सर्व लोकल सुरु करण्यात येत आहेत, सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी नाही असे देखील सुमित ठाकूर यांनी स्पष्ट केले.