महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ । संभाजीनगर ।उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आलेली आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. राज्यात आणखी चार ते पाच दिवस थंडी राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात सोमवारी निफाड येथे सर्वात कमी ६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. या आठवड्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात थंडीचा जोर जास्त राहील.
हवामानशास्त्र विभागानुसार, उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आदी राज्यांत थंडीची लाट आहे. त्यातच मंगळवारी आणि बुधवारी पश्चिमी चक्रवात जम्मू-काश्मिरात दाखल होऊन या भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. परिणामी मध्य प्रदेश, गुजरातसह महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचा जोर जास्त राहील. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली.
परभणी कृषी विद्यापीठात ८.७ अंश
सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान असे – निफाड ६, परभणी कृषी विद्यापीठ ८.७, परभणी शहर ११.३, नाशिक ९.२, पुणे ९.६, मालेगाव ९.६, जळगाव १०.२, औरंगाबाद १०.५, अकोला १०.८, अमरावती ११.२, उस्मानाबाद १२.१, महाबळेश्वर १२.४, सोलापूर १४.९ अंश सेल्सियस.