महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.११ । नवीदिल्ली ।नव्या कृषी कायद्यांबाबत( farm laws ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्पष्टीकरण दिल्यानंतर आंदोलकांनी ( farmers protest ) नवा पवित्रा घेत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार घेतला आहे. १८ फेब्रुवारी रोजी देशभरात रेल रोको करण्यात येणार असून दिल्लीच्या सीमांवर मोठ्या संख्येने आंदोलक जमा करण्याचा निर्धारही करण्यात आला आहे.
बुधवारी मोदींच्या भाषणानंतर शेतकरी नेत्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला. येत्या १२ फेब्रुवारीपासून राजस्थानातील सर्व रस्त्यांवरील टोलनाके टोलमुक्त करण्यात येतील. तसेच १८ फेब्रुवारी रोजी १२ ते ४ या वेळेत रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ देशभरात कँडल मार्च काढण्यात येणार असल्याचेही सांगितले.
बुधवारी गाझीपूर बॉर्डरवर पंजाबी गायक बब्बू सिंग आणि राकेश टिकैत यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी बब्बू सिंग यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. ‘कुणी तुम्हाला मारले तर तुम्ही त्याला जेवायला देऊन लाजीरवाणे करा. यापुढे सरकारच्या तालावर आम्ही नाचणार नाही. शेतकरी आणि मजूर जे सांगतील तेच सरकारला करावे लागेल.’
राकेश टिकैत म्हणाले, सरकारला वाटते की, कडक उन्हामुळे शेतकरी निघून जातील, पण आम्ही ऑक्टोंबरपर्यंत ठाण मांडण्याच्या उद्देशाने येथे आलोय. गाझीपूर बॉर्डरवर किसान क्रांती पार्कची निर्मिती केली जाईल. त्यात भारतीय किसान युनियनचा झेंडा लावू. आमची वीज तोडली तर आम्ही जनरेटर लावून वातानुकुलीत यंत्रणा चालवू. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवत आंदोलनाचे नियम पाळावेत. जे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील त्यांनी किमान एक आठवडा येथे थांबावे नंतर घरी जावे. शेतकऱ्यांनी कारमधून न येता आपल्या ट्रॅक्टर, ट्रॉलीमधून यावे.’