महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२१। मुंबई । राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा वाढत असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत आटोक्यात असलेली रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये कडक निर्बंध करण्यात आले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान वाशिममध्ये काल पासून रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे.
संचारबंदीत रुग्णवाहिका, औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी, ऑटोरिक्षा, हायवेवरील पेट्रोलपंप व ढाबे एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग वगळता सर्व दुकाने व आस्थापना सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याशिवाय आठवडी बाजार, गुरांचे बाजारदेखील बंद करण्यात आले आहे. लग्न समारंभासाठीही पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा (Corona virus) प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सुमारे 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील 15 दिवस मुंबईसाठी खूप महत्त्वाचे असतील, असा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. नागरिकांवर निर्बंध आणण्यासाठी मुंबई प्रशासनानेही कंबर कसली आहे.