महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – निपाणी – दि. २२ -महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीचा विचार करून महाराष्ट्रातून येणाऱ्या गाड्यांना कर्नाटकात नो एन्ट्रीचा आदेश देण्यात आला. कर्नाटक सरकारच्या, जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये आज सोमवारी सकाळी १० वाजता सुमारे पन्नास पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला. परंतु यावेळी एसटी, बसेस, अवजड वाहनांना कर्नाटकात प्रवेश देण्यात येत होता.
७२ तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट प्रवाशाजवळ नसल्यास कोगनोळीजवळ राष्ट्रीय महामार्गावर ती उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यांवरूनच परत महाराष्ट्र पाठवून देण्यात येत होते. त्यामुळे सकाळी १० वाजता कोगनोळी राष्ट्रीय महामार्गावर एकच गोंधळ उडाला होता. येथेवाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.
महाराष्ट्र केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानुसार कर्नाटक सरकारच्या पोलिस प्रशासनाच्यावतीने महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथून प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांना परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे.
आपल्या शेजारील राज्यांमध्ये वाढत असलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून कोगनोळी येथून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना मज्जाव केला आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह जवळपास ५० कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. हे कर्मचारी याठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांकडून प्रमाणपत्राची विचारणा करत आहेत. तसे प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनधारकांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यास मज्जाव घालून परत माघारी महाराष्ट्रात पाठवून देत आहेत.
याठिकाणी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रेड्डी, डीवायएसपी मनोजकुमार नाईक, प्रभारी मंडल पोलीस निरीक्षक आय एस गुरुनाथ, पीएसआय बी एस तळवार यांच्यसह पन्नासहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.