महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२४। संभाजीनगर । कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असून कोरोना नियमांचे पालन राज्यातील जनता करत नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. राज्यात याआधीलॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील 8 दिवसांत जनतेने घ्यायचा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. अनेक ठिकाणी या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता संभाजीनगर शहरात रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. रात्री शहरात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याची अंमलबजावणी 14 मार्चपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या कालावधीत होणार असल्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत.
हा निर्णय आज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. जीवनावश्यक वस्तू, त्यासंबंधीचे उद्योग आणि अशा कर्मचाऱ्यांना या निर्णयामधून सवलत देण्यात आली आहे. कर्फ्यूनंतर साप्ताहिक बाजार आणि दररोजचा भाजीपाला मार्केट चालू ठेवावे की नाही यासंबंधीचा निर्णयही लवकरच घेतला जाईल. याआधी, सातारा, अमरावती, पुणे, वाशीम, नाशिक अशा अनेक जिल्ह्यांमध्ये रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे.