महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २४ – देशातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा उसळी घेतल्यानंतर आता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, केरळ आणि पंजाबमधील नागरिकांना कोरोना नेगेटिव्ह अहवाल असेल तरच दिल्लीत प्रवेश मिळेल. दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वी या पाच राज्यांतील नागरिकांना RT-PCR अहवाल सादर करावा लागेल. 27 फेब्रुवारीपासून या नियमाची अंमलबजावणी होणार असून 15 मार्चपर्यंत तो लागू राहील. (Negative covid report to be mandatory for arrivals from these 5 states)
गेल्यावर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या राज्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. देशातील 11 राज्यांमध्ये मंगळवारी कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 6,218 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, अमरावती आणि नागपूरमध्ये कोरोना प्रसाराचा वेग सर्वाधिक आहे.
तर दुसरीकडे गुजरातच्या 4 जिल्ह्यांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. यामध्ये अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोटचा समावेश आहे. तर मध्य प्रदेशात इंदूर, भोपाळ आणि बेतूल या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रसाराचा वेग वाढला आहे. देशातील एकूण 122 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे.