महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – नवीदिल्ली – सरकारने पुढील दोन वर्षांत आणखी एक कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देण्याची आणि लोकांना स्वयंपाकाचा गॅसचा पुरवठा सुलभ करण्याची योजना तयार केली आहे. ही योजना देशात १०० टक्के लोकांपर्यंत स्वच्छ इंधन पोहोचवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, कमीत कमी ओळखपत्रे आणि स्थानिक रहिवासी प्रमाणपत्रांशिवाय कनेक्शन देण्याची योजना तयार आहे. त्याशिवाय ग्राहकांना लवकरच एका वितरकाऐवजी आपल्या जवळच्या तीन वितरकांकडून एक रिफिल सिलिंडर घेण्याचा पर्याय मिळेल.
कपूर यांनी सांगितले की, फक्त चार वर्षांत गरीब महिलांच्या घरांत विक्रमी आठ कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आले. त्यामुळे देशात एलपीजी वापरकर्त्यांची संख्या जवळपास २९ कोटी झाली आहे. बजेटमध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत आणखी एक कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देण्याची घोषणा करण्यात आली आहे.