महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.९ मार्च – लासलगाव : लॉकडाऊनची परिस्थिती, कोरोनाचा कहर, कांदा पुरवठा अधिक तर मागणीत घट या कारणामुळे कांदा तेराशे रुपयांच्या घरात आल आहे. सध्या कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्यातच परराज्यातील कांदा आता बाजारात यायला सुरुवात झाल्याने महाराष्ट्र राज्यातील कांद्याच्या मागणीत घट होत आहे. त्यामुळे १ मार्चच्या तुलनेत कांदा दर निम्यावर आले आहेत.
राजस्थान, गुजराथ, मध्य प्रदेश, कोलकात्ता या राज्यातून कांदा आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे महाराष्ट्रीयन कांद्यास मागणी कमी झाली. परिणामी भाव कोसळले आहेत. त्यातही मध्यंतरी भाव वाढल्यामुळे शेतकरी कच्चा कांदा विक्रीला आणत आहेत. तसेच लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमावर निर्बंध आहेत. अनेक जिल्हयात वाढता कोरोनामुळे प्रशासनाने निर्बंध कडक केल्याने हॉटेलमध्ये गर्दी कमी झाली असुन कांद्याच्या मागणीत घट झाली आहे.
येथील मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये, सरासरी १३५१ तर जास्तीत जास्त १४३० तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी ९०० रुपये, सरासरी १२५० तर जास्तीत जास्त १३७२ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.