या मागण्यांसाठी राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । मुंबई ।पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्र लिहिले असून त्यांनी यावेळी पत्रातून महिला बचत गटांच्या प्रश्नाला वाचा फोडत सरकारने मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली.

महिला बचत गटाशी संलग्न असणाऱ्या, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेणाऱ्या माता- भगिनींनी कर्जाच्या हप्त्याच्या बाबतीत केव्हाही दिरंगाई केली नाही. पण, बचत गटांच्या व्यवसायांवर कोरोना संकटामुळे गदा आली आणि कर्जाचे हप्ते थकले. पण, ग्रामीण महाराष्ट्रात या कर्ज देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसूलीचा सूर आळवणे सुरूच ठेवले आहे. कर्जदाराच्या घरी जाऊन दमदाटी करणे, त्याचा चारचौघांच्यात अपमान करणे, असले प्रकार सर्रास सुरु असल्याबाबतच्या अनेक तक्रारी आपल्यापर्यंत आल्या असल्याचे राज ठाकरे यांनी या पत्रात अधोरेखित करत सरकारने अशा कंपन्यांवर अंकुश ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ह्या कंपन्यांना कर्जदाराच्या घरी जाऊन त्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जर अशाप्रकारे हे सत्र सुरु राहिल्यास याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम गंभीर असतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *