महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – पुणे – यंदा मार्च महिना संपण्याआधीच राज्याच्या विविध भागांत उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. जागतिक हवामान जोखीम निर्देशांकानुसार (ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स) भारत हवामानाच्या संदर्भात धोक्याच्या सातव्या स्थानावर आहे. ‘नासा’च्या सर्वेक्षणानुसार यंदा एप्रिल-मे महिन्यात उष्ण लहरींचे प्रमाण वाढते राहण्याची सर्वाधिक शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ पर्यावरण आणि हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. हवामान खात्यानुसार, मध्य भारत, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशसह दक्षिणेतील महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश येथे सरासरीपेक्षा अधिक तापमानाची दाट शक्यता आहे. ही वाढ ०.५ अंशांची असेल.
भारताच्या वार्षिक पर्जन्यमानावर परिणाम
२०२० मध्ये वातावरणातील कर्ब वायूचे प्रमाण ४१७ पीपीएम वाढले. परिणामी पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे. भारताच्या वार्षिक पर्जन्यमानावर याचा परिणाम झाला आहे. पावसाळा पुढे सरकत आहे. कमी दिवसात जास्त पाऊस कोसळत आहे. बाष्पीभवन वाढत आहे.