महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ३१ मार्च । संघांचे नवे नाव, नवे सहकारी, नवी जर्सी, नवे प्रायोजक… अशी नाविन्यपूर्ण यंदा आयपीएल हाेणार आहे. टी-२० लीगच्या १४ व्या सत्रासाठी नियमांतही बदल झाले आहेत. सामन्याची वेळ ते सुपर ओव्हरच्या नियमात बदल झाला. त्यामुळे ८५ मिनिटांचा खेळ व पाच मिनिटांच्या टाइम आऊटमुळे पहिला डाव ९० मिनिटांत पुर्ण करणे सक्तीचे असेल. सुपरआेव्हर सामन्यानंतर तासाभरात हाेईल. चेन्नईच्या स्टेडियममध्ये गत चॅम्पियन मुंबई व बंगळुरू सामन्याने ९ एप्रिल राेजी स्पर्धेला सुरुवात होईल. नियम १ एप्रिलपासून लागू होतील. बीसीसीआयने हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे अय्यरच्या जागी ऋषभ दिल्लीचे नेतृत्व करणार आहे.
१२० देशांत थेट प्रक्षेपण; मराठीसह ८ भाषात काॅमेंट्री
आयपीएल २०२१ चे १२० देशांत थेट प्रक्षेपण होईल. त्याचबरोबर, भारतात ८ भाषांत सामन्यांचे समालोचन दाखवले जाईल, ज्यात हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू, बंगाली, कन्नड, मराठी व मल्याळमचा समावेश आहे. प्रक्षेपकांनुसार, यंदाही आयपीएल नेहमीप्रमाणे भव्य व जोरदार असेल.
बदल: ९० मिनिटांत डाव पुर्ण करणे असेल सक्तीचे; कलम १२.७.१ नुसार नवा निर्णय
मिनिमम ओव्हर रेट: गत सत्रात डावाचे अखेरचे षटक ९० व्या मिनिटाला सुरू असेे. आता कलम १२.७.१ नव्या नियमानुसार विनाअडथळा लढतीत एक डाव ९० मिनिटांत पूर्ण होईल. म्हणजे, ८५ मिनिटांचा खेळ व ५ मिनिटांचा टाइम-आऊट असेल. संथ फलंदाजी करणाऱ्या टीमवर कारवाई करण्याचा अधिकार आता पंचांना असेल.
सुपर ओव्हर: विनाअडथळा मॅच बरोबरीत राहिल्यानंतर सामना संपल्यापासून ते तासाभरात सुपर ओव्हर.
नो बॉल: यादरम्यान मैदानावरील पंचांनी दिलेला नो बॉलचा निर्णय हा परिस्थितीनुसार तिसरे पंच बदलू शकतील.
शॉर्ट रन: थर्ड अंपायर हे शॉर्ट रन तपासणार आहेत. आता त्यांच्याकडे मैदानावरील पंचांचा निर्णय बदलण्याचा एक पर्याय असेल. २०१९ आयपीएलमध्ये पंजाब-दिल्लीच्या सामन्यानंतर शॉर्ट रनचा मुद्दा चांगलाच गाजला होता. पंजाबची मालकीण प्रीती झिंटाने अधिकृत तक्रारदेखील केली होती. यासाठी नवीन नियम तयार झाला.
सॉफ्ट सिग्नल : जर-तरच्या परिस्थितीत मैदानावरील पंच सॉफ्ट सिग्नल देणार नाही. अनेक वेळा संभ्रम निर्माण होताे. यापूर्वी, पंचांनी निर्णय हा थर्ड अंपायरकडे रेफर केला, त्याला सॉफ्ट सिग्नलअंतर्गत पहिल्या निर्णयाला मान्यता मिळत होती. भारत-इंग्लंड वनडे मालिकेदरम्यान ‘सॉफ्ट सिग्नल नियम’ बाबत गोंधळ उडाला होता.