महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. १ एप्रिल । शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे बेंगळुरू महामार्गासह नाशिक आणि सोलापूर महामार्गावरील टोलचे दर आज, एक एप्रिलपासून वाढणार आहेत. यामध्ये खेड शिवापूर, आणेवाडी, पाटस, सरडेवाडी, चाळकवाडी आणि हिवरगाव पावसा या टोल नाक्यावर आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये पाच टक्क्यांनी वाढ होणार असून, वाहनचालकांच्या खिशावरील भार वाढणार आहे.
केंद्र सरकार महागाईच्या निर्देशंकानुसार प्रत्येक वर्षी राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दरांत वाढ केली जाते. यापूर्वी २०१९ मध्ये वाढ झाली होती. त्यानंतर आत्ता पुन्हा वाढ केली जाणार आहे. त्यानुसार येत्या एक एप्रिलपासून पाच टक्क्यांनी वाढ होत आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गावरील आणेवाडी आणि खेड-शिवापूर टोलनाका आणि पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा, चाळकवाडी आणि सोलापूर महामार्गावरील पाटस, सरडेवाडी या टोल नाक्यांचा समावेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो.