महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. १ एप्रिल – लॉकडाऊनच्या काळात आणि वाढणार्या कोरोनामुळे राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वच मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले. आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यभरातील विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ऑफलाईन परीक्षेची सक्ती करून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. वर्षभर ऑनलाईन शिक्षण देऊन आता परीक्षा मात्र ऑफलाईन देण्याबाबत राज्यातील शाळा सक्ती करीत असतील, तर शिक्षण उपसंचालकस्तरावर सूचना देऊन त्वरित कार्यवाही करण्याबाबत सूचना देत आहे. पहिली ते नववी आणि अकरावीबाबत लवकरच धोरण स्पष्ट केले जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना नसताना शाळा सोयीनुसार निर्णय घेत विद्यार्थ्यांना वाढत्या कोरोनाच्या काळात वेठीस धरत आहेत, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेच्या आधारावर मूल्यमापन करून या गुणांच्या आधारे वार्षिक निकाल जाहीर करायला हवा, अशी पालकांची मागणी असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळा मनमानी का करीत आहेत, असा सवालही पालकांचा आहे.
ऑफलाईनची परीक्षा देताना विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात. एखादा मुद्दा विस्तारपूर्वक लिहिणे अपेक्षित असते; पण ऑनलाईनमध्ये कमी वेळात सर्व काही विस्ताराने शिकवलेले नसताना त्याची उत्तरे द्यायची कशी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. मुंबईतील अनेक शाळा मुलांना व्हॉटस् अॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिका पाठवून घरी सोडवण्याबाबत सूचना देत आहेत. त्या सोडविलेल्या उत्तरपत्रिका पालकांना शाळेत जमा करण्याबाबत सूचना करीत आहेत. काही शाळा तर परीक्षेला न येणार्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना गुण कपातीच्या धमक्याही देत आहेत. यामुळे पालक संतप्त झाले आहेत.