विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी संभाजीनगरात ठिय्या; ‘हेच जंतर-मंतर’ म्हणत नव्या आंदोलनाची घोषणा
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट २०२६ ।। CJP Abhijeet Dipke : बॉम्बे हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचणी आल्याच्या तक्रारींमुळे विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला आहे. १६ ऑगस्ट रोजी राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान काही केंद्रांवर परीक्षा प्रक्रियेत अडथळे आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. छत्रपती संभाजीनगरात तर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा असल्याने ‘सर्व काही सुरळीत आहे’ असे कागदी समाधान देऊन हा विषय मिटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. याच पार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आंदोलनस्थळी पोहोचले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांनी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी दीपके यांच्यासमोर मांडली. तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची, हा मूळ प्रश्न आहे. नोकरीच्या एका संधीसाठी हजारो तरुण दिवस-रात्र अभ्यास करतात. परीक्षा केंद्रावर संगणकाने साथ सोडली, सर्व्हरने दगा दिला किंवा तांत्रिक यंत्रणा कोलमडली, तर त्याची किंमत विद्यार्थ्यांनीच का मोजावी, असा सवाल उपस्थित होत आहे. दीपके यांनी विद्यार्थ्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत “जागेवरून उठायचं नाही” अशी भूमिका मांडली.
याच वेळी दीपके यांनी आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीर केला. “जोपर्यंत परीक्षा पुन्हा होईल असे आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत मागे हटायचे नाही. आता हेच जंतर-मंतर,” अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू करण्याचे संकेत दिले होते. जून-जुलैमध्ये शिक्षणव्यवस्थेतील प्रश्नांवर दीपके यांच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतरवर आंदोलन झाले होते. त्या आंदोलनाला देशभरातून प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे संभाजीनगरातील हा ठिय्या आता केवळ एका परीक्षा केंद्रापुरता राहणार की राज्यव्यापी आंदोलनाचे रूप घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, परीक्षेतील तांत्रिक अडचणींबाबत संबंधित परीक्षा यंत्रणा आणि न्यायालयीन प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण किंवा पुनर्परीक्षेबाबत निर्णय होणे महत्त्वाचे आहे. कारण परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा नाही; यंत्रणा चुकली तर ‘पुन्हा प्रयत्न करा’ म्हणणे सोपे असते, पण त्यामागे गेलेला वेळ, पैसा आणि मानसिक ताण परत मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करून दोष कुठे झाला, किती विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आणि पुनर्परीक्षा आवश्यक आहे का, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने देणे गरजेचे आहे. अन्यथा एका तांत्रिक बिघाडातून उभा राहिलेला रोष सरकारसाठी नवे आंदोलन बनू शकतो.
