महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ४ एप्रिल ।भारतीय क्रिकेट टीमसाठी (Team India) हे वर्ष चांगलंच यशस्वी ठरलं आहे. टीम इंडियानं या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन दिग्गज देशांना पराभूत केले आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी या विजयाबद्दल भारतीय टीमची प्रशंसा केली आहे.
गांगुलीनं एका ऑनलाईन अॅपला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय टीममधील खेळाडूंबाबत मत व्यक्त केलं आहे. ‘देशातले काही खेळाडू जबरदस्त आहे. बोर्डाचा अध्यक्ष म्हणून मला सगळेच खेळाडू आवडतात. मी कोणत्याही एका खेळाडूचं नाव घेणं योग्य नाही,’ असं गांगुलीनं सुरुवातीलाच स्पष्ट केले.
गांगुलीनं यावेळी त्याला सर्वाधिक प्रभावित केलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूचे नावही सांगितले. ‘ मी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या खेळाचा आनंद घेतो. पण, ऋषभ पंतमुळे (Rishabh Pant) सर्वात जास्त प्रभावित झालो आहे. तो एक पूर्ण ‘मॅच विनर’ आहे,’ असं गांगुलीनं यावेळी सांगितले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी देखील जबरदस्त आहे. मला शार्दुल ठाकूर देखील आवडतो कारण तो झुंजार खेळाडू आहे, असे गांगुलीने स्पष्ट केले.
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या जबरदस्त गुणवत्ता आहे. सुनील गावसकर खेळत होते तेव्हा क्रिकेट फॅन्स त्यांच्यानंतर काय होणार? हा विचार करत. त्यांच्यानंतर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे हे खेळाडू आले. सचिन आणि द्रविड रिटायर झाल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत या खेळाडूंनी टीमला सांभाळले,’ असं गांगुली यावेळी म्हणाला.
सौरव गांगुलीला प्रभावित केलेल्या ऋषभ पंतनं या वर्षात धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यानं इंग्लंड विरुद्धच्या चार टेस्टच्या मालिकेत एका शतकासह 270 रन काढले. टी 20 मध्ये 102 तर वन-डे मालिकेत दोन मॅचमध्ये 155 रन पंतनं काढले होते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतही पंतनं झुंजार खेळ केला. त्यानं 3 टेस्टमध्ये 274 रन केले होते.