महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ६ एप्रिल । नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची उद्या मंगळवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यासोबतच दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी आणखी काही उपाययोजना अथवा त्यांच्या वेळापत्रकात काही बदल करण्यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असून परीक्षांसोबत 20 टक्के अनुदानाचा विषयही प्रामुख्याने बैठकीत घेतला जाणार असल्याने शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींसोबतच शिक्षक आमदारही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे शालेय शिक्षण विभागाने याआधीच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवायच पास करण्याचा निर्णय घेतला. माञ नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. कोरोनामुळे राज्यात शाळा आणि महाविद्यालये बंद असून परीक्षा कशा घ्यायच्या हा प्रश्न आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या होणाया या बैठकीत नववी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी त्यांना प्रमोट करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.