महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.११ एप्रिल ।राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना अवकाळी पावसानेही अडचणीत भर घातली आहे. अनेक जिल्ह्यांध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी, वातावरण बदलामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
साताऱ्यात शनिवारी सायंकाळी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या होत्या. रविवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याचे दिसून येत आहे.पुणे जिल्ह्यातील वातावरणही ढगाळ असल्याची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती.मुंबईत देखील वातावरणात बदल झाला आहे. येत्या 4-5 दिवसात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे विदर्भातील 1 ते 2 जिल्ह्यात गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस झाला असून वीज पडून एक जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यात हलका पाऊस पडला. जिल्ह्यातही वीज पडून एक 45 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात रात्री मेघागर्जनेसह तासभर जोरदार पाऊस झाला.