महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.११ एप्रिल ।महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे अनेक शहरात लसींचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कडक निर्बंध लादले असून देखील रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे म्हणत महाराष्ट्रात 8 ते 15 दिवस कडक लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. आज टास्क फोर्स बरोबर होणाऱ्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय म्हणजेच लॉकडाऊन किती दिवसांचा असेल, याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे, असे एकमत या बैठकीत सर्व पक्षांचे झाले आहे.
यावेळी बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेतली असून ते म्हणाले, रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. यासाठी हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. एक रुग्ण 25 जणांना बाधित करत असल्याने साखळी तोडणे गरजेचे आहे. रुग्णांना ट्रेसिंग करणे कठीण जात आहे. त्यामुळे निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. पुढे ते म्हणाले, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.