महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.१३ एप्रिल । हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. हा एक दाक्षिणात्य सण असून तो वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी या दिवशी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा गुढी पाडव्यापासूनच प्रारंभ होतो. महाराष्ट्रात या दिवशी लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा इतर भारतीय प्रांतांत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस चेटी चांद, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने या सणाला महाराष्ट्रात ‘गुढीपाडवा’ असे संबोधले जाते.
गुढी या शब्दाचा तेलुगू भाषेत अर्थ ‘लाकूड किंवा काठी’ असा आहे. तसाच तो ‘तोरण’ असाही आहे. कुडी या शब्दाचा हिंदीत एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. त्यातूनच गुढी या शब्दाचा उगम झाला असावा. ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी खातात. त्यामुळे पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे आणि असे अनेक औषधीगुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदशास्रात मानले जाते. कडूनिंबाची पाने शरीराला थंडावा देणाऱ्या अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.